गाथा कर्तृत्वाची

share on:

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. महासत्ता बनण्याच्या दृष्टीने आपल्या राष्ट्राची वाटचाल सुरू आहे. परंतु आजही देशातील बहुसंख्य स्त्रियांना असमान वागणूक मिळत असून त्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे. मात्र, असे असले तरी परिस्थितीशी झुंज देत अनेक महिला आज पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आपल्याला ओळख करून देणार आहोत अशाच काही कर्तृत्ववान

औद्योगिक क्रांतीच्या सुरूवातीपासूनच युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करण्यास सुरुवात केली. पश्चिम राष्ट्रांमध्ये स्त्री-पुरुष यांच्यामध्ये दुजाभाव न करता त्यांना समान वागणूक दिली जाते. मात्र, काही ठराविक राष्ट्रे वगळल्यास, बहुसंख्य देशांमधील स्त्रियांना आजही असहाय्य पद्धतीत जीवन जगावे लागत आहे.

आपल्या देशातील संस्कृती, एकता आणि विविधता याबद्दल जगभरात बोलले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षे उलटली असून विकासाची परिभाषा हळू-हळू बदलत आहे. तरी देखील स्त्रियांना आज समाजात दुय्यम दर्जाचे स्थान दिले जात आहे. मात्र, असे असले तरी परिस्थितीवर मात करत आपल्या देशातील महिला आता सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत असून स्वत:ची ओळख निर्माण करत आहेत. राजकारणात विरोधी पक्ष नेते पदापासून ते मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्षा, राष्ट्रपती, पंतप्रधान, अशी सर्वोच्च पदे भूषवीत आहेत. इतकेच नव्हे तर काही महिलांनी जगातील १०० शक्तिशाली  व्यक्तींच्या यादीत येण्याचा मान देखील पटकावला आहे. आयसीआयसीआयच्या चंदा कोचर, पेप्सिकोच्या इंद्रा नुई, बायोकॉनच्या किरण मजुमदार, मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या नीलम धवन यांच्यासारख्या महिलांनी जागतिक कॉपरेरेट विश्वात आपला दरारा निर्माण केला आहे.

काही वर्षापूर्वी केवळ पुरुषवर्गच व्यावसाय करू शकतो असे समजले जायचे. स्त्री म्हटले की तिचा संबंध केवळ ‘मूल आणि चूल’ यांच्याशीच जोडला जायचा. मात्र, जागतिकीकरण आणि शहरीकरणामुळे आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. शिक्षणाचा प्रसार आणि जनजागृतीमुळे केवळ घराच्या चार भिंतीत आपले जीवन जगणा-या महिला चौकटीच्या बाहेर पडून स्व:कर्तृत्वाने स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहेत. करिअर आणि कुटुंब या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत, ‘चूल आणि मूल’ संभाळणा-या स्त्रियांनी आपले अस्तित्व केवळ स्वयंपाकाच्या खोलीपुरतं मर्यादित न राखत ते स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये देखील निर्माण केले आहे. अंगी असलेली कलाकौशल्ये केवळ चार भिंतींच्या आत दडवून न ठेवता पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी एनर्जी, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनीअरिंग, कंस्ट्रक्शन, मार्केटिंग, आय.टी, बीपीओ, अशा विविध क्षेत्रांपर्यंत मजल मारली आहे. कोणाचाही पाठिंबा नसताना देखील अनेक महिलांनी संघटित होऊन लघु व मध्यम उद्योग सुरू केलेत. विशेष म्हणजे त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने नवे विश्व निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा आज स्त्रिया बाळगत आहेत. केवळ सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठीच नाही, तर देशातील गरिबी संपुष्टात आणण्यासाठी देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासामध्ये महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही देशातील महिलांना हुंडाबळी, शारीरिक व लैंगिक अत्याचार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. माणुसकीला काळिमा फासणा-या स्त्री भ्रूणहत्येसारख्या घटना आज देखील घडत आहेत. सुशिक्षित कुटुंबात देखील स्त्री अर्भक जन्माला येताच ती ‘नकोशी’ होते. सातारा जिल्ह्यात आंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवेतील कर्मचा-यांद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ज्वाली, माण, पाटन, खंडाळा आणि फलटन या भागांमध्ये २२२ मुली या ‘नकोशी’ (मुलगा हवा असताना, मुलगी जन्माला आली म्हणून ती नकोशी) या नावाच्या असल्याचे आढळल्या. जरी काही महिलांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत सर्वोच्च स्थान मिळवले असले तरी,  समाजातील संकुंचित वृत्तीला बळी पडत असलेल्या लाखो स्त्रियांना मानाचे स्थान व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी ठोस पाऊल उचलले गेले पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहणे ही काळाची गरज असून आगामी काळात पुरुषांप्रमाणे महिलांना देखील प्रत्येक क्षेत्रात समान दर्जा मिळेल अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने करूया.

‘माणदेशी’च्या माध्यमातून केले सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन

maandeshi

मुंबईतील इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या, अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवलेल्या, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यां, महिलांच्या प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक, अशी ओळख आहे ती चेतना सिन्हा यांची. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायाण यांच्या नेतृत्वाखालील चळवळीत सक्रिय सहभाग घेतेलेल्या सिन्हा या विवाहानंतर सातारा जिल्हयातील म्हसवड सारख्या ग्रामीण भागात आल्या. महिलांना आर्थिक-सामाजिक पाठबळ देणारी चळवळ उभी करून ‘माणदेशी महिला सहकारी बँके’ची स्थापना केली व आजवर हजारो ग्रामीण आणि अशिक्षित महिलांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे.

१९८० च्या आधी म्हसवड हे सुखी आणि समम्ृद्ध गाव होते. तेथे मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन व्हायचे. परंतु १९८० च्या दशकात आलेल्या दुष्काळामुळे गावातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली. परिणामी रोजगार मिळविण्यासाठी पुरुष मंडळी दुस-या शहरात स्थलांतर करायचे व कुटुंबाचा सर्व भार महिलांवर पडायचा. त्यामुळे म्हसवडला आले असताना चेतना सिन्हा यांनी स्थानिकांच्या समस्या समजून घेतल्या व दुष्काळात सरकारकडून मिळणा-या योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळवून दिला. रोजगारासाठी स्थानिकांचे होणरे स्थलांतर रोखण्यासाठी व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी १९९७ साली माणदेशी फाऊंडेशनची स्थापना केली. दरम्यान, गावात बँक सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले व रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांची माहिती मिळवली व आवश्यक असलेला पैसा उभा करून प्रस्ताव बँकेकडे पाठवला. मात्र, सर्व संचालकांना लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्यांनी सहीच्या जागी अंगठय़ाचा ठसा उमटवला होता. त्यावर आक्षेप घेत रिझव्‍‌र्ह बँकेने प्रस्ताव फेटाळून लावला. तीन वर्षे अथक परिश्रम करून तयार केलाला प्रस्ताव बँकेने आपल्याला लिहिता-वाचता येत नसल्यामुळे फेटाळल्याचे जेव्हा संचालिकांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन शिक्षण घेतले. काही कालावधीनंतर त्यांनी प्रस्ताव पुन्हा तयार केला  व अखेर रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘चीफ जनरल मॅनेजर’ यांची परवानगी मिळवली.

ऑगस्ट १९९८मध्ये चेतना सिन्हा यांनी ‘माणदेशी महिला सहकारी बँके’चा शुभारंभ केला. दुस-या दिवशी बँकेत खाते उघडण्यासाठी मोठी गर्दी होईल अशी सर्व संचालकांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडलेच नाही. त्यामुळे सिन्हा यांनी गावातील महिलांना भेटण्यास सुरुवात केली. पोटा-पाण्यासाठी काम करत असल्यामुळे महिलांना बँकेत येण्यासाठी वेळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बँकेनेच महिलांकडे जाण्याचे ठरवले व पैसा गोळा करण्यासाठी महिला प्रतिनिधींची नेमणूक केली.  बघता बघता बँकेच्या कामाला वेग येऊ लागला आणि पहिल्या वर्षीच बँकेने ६ लाखांचे शेअर आणि ६७ लाखांचे डिपॉझिट जमा झाले.

छोटय़ा व्यावसायांना कर्ज दिले जात नाही. त्यामुळे त्यांनी नवीन योजना सुरू करून वाळू वाहतूक, दूध विक्री, खानावळ, बुरूड काम, चहा-वडापावची गाडी चालवणाऱ्या महिलांना कर्जवाटप करण्यास सुरुवात केली. तसेच महिलांनी उद्योग क्षेत्रात प्रवेश करावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘माणदेशी तरंग वाहिनी’ हे कम्युनिटी रेडियो केंद्र सुरू केले.

महिलांना तंत्रज्ञान, अर्थकारण, विपणन, फोटोग्राफी, स्क्रीन प्रिंटिंग, इंगजी भाषा व संगणक आदी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘एचएसबीसी’च्या सहाय्याने ’माणदेशी उद्योगिनी’ या ‘बिझनेस स्कूल’ची स्थापना केली.

आजवर ‘माणदेशी’ने केलेल्या विविध प्रयोगांची आणि उपRमांची दखल रिझव्‍‌र्ह बँकेने घेतली असून ‘माणदेशी‘ला सहकार्य करण्यासाठी ‘एचएसबीसी’, एॅक्सेंचर, ब्रिटिश एशिया ट्रस्ट अशा विविध संस्था पुढाकार घेत आहेत.

चेतना सिन्हा यांनी ग्रामीण भागात १५ वर्षापूर्वी सुरू केलेले उपRम आज माठ्या प्रमाणात विस्तारले असून बँकेच्या ठेवी ५० कोटींपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांनी घडवून आणलेल्या आर्थिक आणि सामाजिक Rांतीसाठी सन २००२-०३ मध्ये त्यांची ‘येल’ विद्यापीठाच्या ‘वर्ल्ड फेलो प्रोग्रामसाठी’ निवड झाली होती. २००५ साली जानकीदेवी बजाज या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच नोव्हेंबर २०१०मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मुंबईला भेट दिली असताना ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या बिझनेस समिटमध्ये त्यांचा देखील समावेश होता.

जनजागृतीसाठी त्यांनी केला आरोग्य क्षेत्रात प्रवेश

kanchanआपल्या जवळची एखादी व्यक्ती अनपेक्षितपणे आपल्याला कायमची सोडून गेली तर ती परिस्थिती आपल्याला बरेच काही शिकवून जाते. आर्थिकदृष्टय़ा भककम असताना देखील प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी न केल्यामुळे कांचन नयकावाडी यांच्या वडिलांना कर्करोग असल्याचे निदान अंतिम टप्प्यात झाले व वयाच्या ५०व्या वर्षीच त्यांना प्राण गमवावे लागले.

कर्करोग, हृदयविकार आणि मधुमेह या सारख्या आजाराचे निदान योग्यवेळी नाही झाले तर पैसा, तंत्रज्ञान, विमा योजना अथवा कोणत्याही गोष्टी आजार बळावण्यापासून वाचवू शकत नाहीत. अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे आपल्या देशात आजार बरा करण्यापेक्षा तो प्रतिबंधात्मक कसा करता येईल, यावर जास्त लक्ष केिंद्रत केले जात नसल्याचे कांचन नयकावाडी यांच्या लक्षात आले. यासाठी आपण काही करू शकतो का? असा विचार त्यांच्या मनात आला व त्यातूनच सुरुवात झाली ती आज नावारूपाला आलेल्या ‘इंडस हेल्थ प्लस’ या कंपनीची.

सामान्य गृहिणी यशस्वी उद्योजक कशी बनू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘इंडस हेल्थ केअर’च्या कांचन नयकावाडी. मुंबईत जन्मलेल्या आणि वाणिज्य शाखेमधून आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या कांचन नयकावाडी या आयुष्यभर खाजगी संस्थेत नोकरी करू शकल्या असत्या. परंतु कर्करोग, हृदयविकार आणि मधुमेह या आजारांमुळे देशातील ३० ते ६० या वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लोकांमध्ये ‘प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी’ बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘हेल्थकेअर’ सेक्टरमध्ये प्रवेश केला. २००० साली पुण्यातील इडन हॉल येथे ३००० चौरस फुटांच्या जागेवर स्वत: बचत केलेल्या पैशातून, केवळ ८ लोकांसोबत ‘इंडस हेल्थ प्लस’ची सुरुवात केली होती. आज त्याचे १०० कोटींच्या ‘हेल्थ केअर’ इंडस्ट्रीमध्ये रूपांतर झाले आहे. गेल्या ११ वर्षाच्या कालावधीत इंडसने आपला विस्तार २६ शहरांमध्ये केला असून ४८ केंद्रे सुरू केली आहेत. तर सुमारे ४०० कर्मचारी काम करत आहेत.

नागरिकांनी जर आपल्या कल्पनेचा ‘प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा’ असा अर्थ लावला तर आपले जीवन धोक्यात येईल, अशी शंका जेव्हा काही डॉक्टरांनी उपस्थित केली, तेव्हा एक उद्योजक म्हणून त्यांच्या समोर खरे आव्हान उभे राहिले. कारण कोणताही आजार नसताना किंवा आजाराची लक्षणे नसताना आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्याच्या कल्पनेशी आपल्या देशातील नागरिक अजून एकरूप झालेले नाहीत. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे ही देखील त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब होती.

‘इंडस हेल्थ प्लस‘ने आजपर्यंत ३.६ लाख पेक्षा जास्त लोकांची तपासणी केली असून भारतातील सर्वात मोठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. आगामी काळात संपूर्ण देशभरात ‘प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी’ Rेंद्र सुरू करून २५ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका आणि अफ्रिका या भागांमध्ये देखील विस्तार करण्याची त्यांची इच्छा आहे.

देशातील स्त्रिया एका बाजूला पारंपरिक भूमिकेतून बाहेर पडून पुरुषांप्रमाणेच स्वत:च्या कर्तृत्वाने आपल्या पायावर उभ्या राहत आहेत. करिअर आणि कुटुंब या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत आहेत. मात्र, असे असतानाही महिलांच्या स्वातंत्र्यावर काही समाजकंटक नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत त्यांना वाटते.

सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना वूमन लिडर इन हेल्थकेअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०१२ या वर्षीचा बार्सेलोना चेंबर ऑफ कॉमर्स, चेंबर ऑफ कॉमर्स मॅनहॅथन आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘आय डब्लू ई सी’-२०१२ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. वूमन इन बिझनेस हा २०१२ सालचा ‘स्टिव्ही पुरस्कार‘ही त्यांना न्यूयॉर्क येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर ग्राहक सेवेसाठी आशियातील महिला उद्योजक श्रेणीत त्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.

‘ती’ बनली गावाची आशा

SHOBHAपरिस्थिती अत्यंत हलाखीची-जेमतेम दोन वेळेस जेवायला मिळेल एवढेच उत्पन्न, त्यात वाढत्या महागाईने त्रस्त. मात्र, अशा स्थितीत देखील सामाजिक कार्य करण्यासाठी ती स्वत:हून पुढे सरसावली असून गावकऱ्यांसाठी आशेचा किरण बनली आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील ‘वजे’ या खेडेगावात राहणा-या शोभा पाटणकर एका शेतकरी कुटुंबातील गृहिणी आहेत. त्यांचे पती शेती करत असून घरखर्चासाठी थोडा आधार मिळावा म्हणून त्या गावातच शिलाईचे काम करतात. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या पाटणकर यांना आगोदरपासूनच समाजसेवेची आवड होती. मात्र, स्वत:च्या कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागत असताना, आपण इतरांची काय सेवा करणार, असा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा. परंतु २००९ साली, शासनाने सुरू केलेल्या ‘आशा’ या कार्यRमाबाबत त्यांना कळले व त्यांचे अवघे जीवनच बदलून गेले. जरी त्यांची हलाखीची परिस्थिती खूप बदलली नसली, तरी त्यांचे समाजातील स्थान आज उंचावले असून त्या गावाची ‘आशा’ बनल्या आहेत.

शोभा पाटणकर या शिकलेल्या असून त्यांना लिहिता वाचता येत असल्याचे ग्रामसेवकांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी व गावातील काही लोकांनी पाटणकर यांना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य उद्दिष्ट अंतर्गत गावातील ‘आशा’ होण्यासाठी अर्ज भरण्यास सांगितले. पुरंतु त्या अर्ज भरण्यासाठी गेल्या असता, त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे त्यांना खोटे सांगण्यात आले. पाटणकर या शिक्षित असल्यामुळे, ‘आशा’ होण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आपल्याकडे नसताना व कोणतीही स्वाक्षारी न करता आपला अर्ज कोणी भरला? व तो कसा स्वीकारला गेला? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. परंतु त्यांना कोणीही दाद देत नव्हते. दरम्यान, तालुक्यात निवडणुका होणार होत्या, त्यामुळे राजकीय पक्ष मतं मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. परंतु त्यांची हाजी-हुजी करण्याऐवजी, आपल्याला गावाची ‘आशा’ व्हायचे असून त्यासाठी लागणारी कागदपत्रे जो मिळवून देईल, त्यालाच मतदान करेन, अशी अट त्यांनी घातली. अखेर  आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांना मिळाली व त्यांनी आपला अर्ज दाखल गेला.

शोभा पाटणकर या गेल्या ४ वर्षापासून ‘वजे’ गावातील ‘आशा’ बनल्या असून आवश्यक असलेले प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. ‘एनआरएचएम’ अंतर्गत गावातील गरोदर महिलांनी अर्भकास घरी जन्म न देता रुग्णालयात जावे, यासाठी त्यांना प्रवृत्त करणे,  गरोदर मातांची नोंद करणे, नवजात बालकास वेळेवर लस देणे, कुटुंब नियोजनासाठी पुरुषांना प्रवृत्त करणे, बाळ जन्माला आल्याच्या ४२ दिवसांपर्यंत त्याची काळजी घेणे, गावात तापाची किंवा इतर रोगांची साथ आल्यास त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे, कुष्टरोग असलेल्या व्यक्तींची नोंद करणे, जन्म-मृत्यूचा दाखला बनवून आणणे, अशा विविध गोष्टींकडें त्या लक्ष देत आहेत.

पाटणकर ज्या ‘वजे’ गावात राहतात, त्या गावात दिवसभरातून केवळ एकच एसटी जाते. त्यामुळे एसटी पकडून दुस-या गावी जाण्यासाठी त्यांना ४ किलोमीटरचा पल्ला चालत गाठावा लागतो.

सुरुवातीला जेव्हा ही योजना राबविण्यास सुरुवात झाली, तेव्हा पाटणकर यांना मानधन देखील मिळत नव्हते. जर आंगणवडी सेविकांना थोडेफार मानधन मिळते, तर आपल्याला काहीतरी मिळावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. जवळपास वर्षभर त्यांना कोणतेही मानधन मिळत नव्हते. मात्र, आता त्यांना प्रत्येक ‘केस’ नुसार थोडेफार पैसे मिळत असून त्यांचे महिन्याचे एकूण उत्पन्न हे ३५०० रुपये इतके झाले आहे. शेतीमुळे वर्षाला केवळ २५-३० हजार रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या शोभा पाटणकर या गावाची ‘आशा’ बनल्यामुळे त्यांचा फायदा गावकऱ्यांना तर होतच आहे, मात्र त्याच बरोबर त्यांना देखील थोडाफार आर्थिक आधार मिळत आहे.

शोभा पाटणकर यांना ‘आशा’ अंतर्गत मिळणारे मानधन

  • गावातील कुटुंबाचे कुटुंब नियेजन करून आणल्यास – १५० रुपये
  • गरोदर महिलेस डिलेव्हरीसाठी रुग्णालयात नेल्यास -२०० रुपये
  • नवजात बालकाची 42 दिवस योग्य काळजी घेतल्यास -२५० रुपये
  • एच.आय.व्ही.बाधित असल्याचे निदर्शनात आणल्यास -२५० रुपये
  • जन्म-मृत्यूचा दाखला बनवून आणल्यास – ३० रुपये

आपल्या गावात एसटीच्या फेऱ्या वाढाव्यात त्याच बरोबर एखादा छोटासा दवाखाना व्हावा, गावकऱ्यांना रोजगार मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. ‘आशा’च्या माध्यमातून पाटणकर या अशिक्षित असलेल्या गावकऱ्यांना मोलाचे सहकार्य करत आहेत.

पाच लाख लोकांना उपलब्ध करून दिला रोजगार

Varsha_Satpalkarबेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन मधुसूदन सत्पाळकर यांनी १९९९ मध्ये ‘नेटवर्क मार्केटिंग’च्या माध्यमातून ‘मैत्रेय’ या कंपनीचा पाया रचला. परंतु दुर्दैवाने ‘मैत्रेय’ची स्थापना होऊन केवळ पाच वर्षे उलटली असताना त्यांचे निधन झाले. मात्र, अशा परिस्थितीत देखील न डगमगता पतीच्या निधनानंतर केवळ तीन दिवसांतच वर्षा सत्पाळकर यांनी उद्योगाची धुरा हाती घेतली, व दहा वर्षाच्या कालावधीत रियॅलिटी, पब्लिकेशन, हॉस्पिटॅलिटी, कम्युनिकेशन, रूरल ग्रोथ व्हेंचर आणि सोशल सव्‍‌र्हिस अशा विविध क्षेत्रात प्रवेश करून ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या ‘मैत्रेय’ समूहाला नावारूपाला आणले आहे.

बिझनेस चालविण्याचे कोणतेही शिक्षण व अनुभव नसताना देखील अपघाताने उद्योग क्षेत्रात आलेल्या ‘स्वयंप्रेरणादायी’ आणि वेळप्रसंगी नवीन मार्ग शोधून त्यातून बाहेर पडणाऱ्या वर्षा सत्पाळकर यांनी संसार बाजूला ठेवून उद्योग क्षेत्रात प्रवेश केला. पण त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा नव्हता. पतीच्या निधनानंतर ५ वर्षाच्या मुलीचा सांभाळ करत त्यांनी जेव्हा ‘मैत्रेय’ची जबाबदारी हाती घेतली, तेव्हा त्यांच्या अननुभवाचा गैरफायदा घेऊन अनेकांनी त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. पण पतीप्रमाणेच अफाट कष्ट आणि माणसांची चोख पारख या जोरावर त्या न डगमगता उभ्या राहिल्या.

‘मैत्रेय’ची धुरा हाती घेताच, अत्यंत कमी कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जळगांवमधील ‘मैत्रेयाज’ हॉटेलच्या जागी क्लब बांधायची योजना होती. मात्र, त्यांनी त्या ठिकाणी हॉटेल बांधले व केवळ तीन वर्षात त्या हॉटेलला त्रितारांकित दर्जा मिळवला. विशेष म्हणजे खानदेशातील हे एकमेक त्रितारांकित हॉटेल आहे. तसेच ‘रूरल टुरिझम’ ही संकल्पना अस्तित्वात नव्हती त्यावेळेस मधुसूदन सत्पाळकर यांनी बोईसर येथे ‘मामाचं गांव’ हे रिसॉर्ट सुरू केले.

‘रिअ‍ॅलिटी’ क्षेत्रात जेव्हा त्यांनी प्रवेश केला, तेव्हा कंस्ट्रक्शनमध्ये ‘प्रॉफिट मार्जिन’ किती ठेवायचं, लँड डील कसं क्लोज करायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं या सगळय़ा गोष्टींचे शिक्षण घेणे त्यांच्या समोर एक आव्हान होते. परंतु त्या सगळय़ा प्रश्नांवर मात करत त्यांनी वसई, विरार, जळगांव व सांगली या भागात गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण केले आहेत. नाशिकला ४० बंगल्यांचा ‘पांडववन’ हा प्रकल्प उभारला आहे. मुंबईजवळ ससूनवघर येथे ९७ शाही बंगल्यांचा प्रकल्प उभारण्याची त्यांची योजना आहे. त्याचप्रमाणे पुणे, नागपूर, औरंगाबाद, वसई, धुळे, जळगांव येथे सर्वसामान्यांना परवडण्याजोगी घरं बांधण्याचे ध्येय आहे. नाशिकमध्ये ‘आयजीबीसी’ ने गोल्ड सर्टिफिकेट दिलेला ‘मैत्रेय’ ग्रीन हा पहिला पर्यावरणवादी प्रकल्प येत्या गुढीपाढव्याला सुरू होत आहे. बांधकाम क्षेत्रात ‘मैत्रेय’ हा स्वत:चा ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी त्यांची घौडदौड सुरू आहे.

ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील युवकांना गावांमध्येच ‘व्हाईट कॉलर्ड’ जॉब्स मिळवून देण्यासाठी कंपनीने अलीकडेच ‘मैत्रेय रूरल ग्रोथ व्हेंचर प्रा.लि.’ ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीतर्फे विदर्भातील यवतमाळ जिल्हयातील अविकसित अशा वणीमध्ये पहिले ‘रूरल बीपीओ’ सुरू करण्यात आले असून त्यात ८० टक्के  मुली काम करतात. राजस्थान येथील उदयपूर येथे ‘कत्था’ या आदिवासी जमातीला आयसीआयसीआय फाऊंडेशन व कॉनबॅकच्या मदतीने बांबूपासून फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना बिझनेस मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

२कोकण निसर्ग मंच या संस्थेच्या फळ प्रRिया उत्पादनांना देश-विदेशात बाजारपेठ मिळून देण्यासाठी ‘मैत्रेय’ प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने ‘सिंधू स्फूर्ती’ हा बँड्र ग्लोबल कोकण महोत्सवात लाँच केला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियात पदार्पण करण्यासाठी चित्रपटांच्या शतकपूर्तीचे योग साधून ‘मैत्रेय मास मीडिया प्रा.लि.’ ही कंपनी स्थापन करून ‘टपाल’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

उद्योग वाढवताना आपण सामाजिक भान, माणुसकी जपली पाहिजे व त्यासाठी ‘मैत्रेय’ फाऊण्डेशनच्या मध्यमातून बोईसरजवळचं ‘गुंदले’ हे गाव दत्तक घेतले आहे. तसेच आरोग्य कलापीठ व ज्ञानपीठाच्या माध्यमातून राज्यभर विविध उपRम राबविले आहेत.

दहापेक्षा अधिक कंपन्या आणि ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेला ‘मैत्रेय समूह’ आज विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. केवळ एक-दोन नव्हे तर तब्बल ९ राज्यांमध्ये पसरलेला व सुमारे ५ लाख लोकांना रोजगार मिळवून देणा-या ‘मैत्रेय’ उद्योग समूहाची धुरा वर्षा सत्पाळकर यशस्वीपणे संभाळत आहेत.

परिस्थितीला शरण न जाता धैर्याने उभे राहणा-या व अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान असलेल्या वर्षा सत्पाळकर यांच्या कर्तुत्वाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

(THIS ARTICLE IS PUBLISHED IN MARCH-2013 ISSUE OF  ’YUVA’ MAGAZINE OF RANE PUBLICATION)

Pratik Mukane

Pratik Mukane

is an engaging journalist with a strong passion for writing and constantly chasing breaking news. With over 12 years of experience, he writes on politics, current affairs, social issues, and a bit of everything. Currently, he is working with The Times of India. Based in Mumbai, the financial capital of India, he enjoys telling meaningful stories.

Leave a Response

share on: